वीज ग्राहकांच्या १२७७ तक्रारींचा जाग्यावर निपटारा मेळाव्यांप्रती ग्राहकांकडून समाधान व्यक्त
कोल्हापूर/ प्रतिनिधी
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत उपविभागीय स्तरापर्यंतचे ग्राहक मेळावे घेण्याचे निर्देश मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले होते. कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या सुचनेनुसार सदर मेळाव्यांची व्याप्ती वाढवून सदरचे ग्राहक मेळावे आज सोमवार (दि.११) रोजी शाखा कार्यालयांपर्यंत एकूण १९१ ठिकाणी घेण्यात आले. त्या मेळ्याव्यांचा लाभ जिल्ह्यातील १४४० ग्राहकांनी घेतला. यापैकी १२७७ ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा जागेवर करण्यात आला. तर प्रलंबित १६८ तक्रारीं विहित वेळेत निकाली काढण्याचे आदेश कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी दिले आहेत. तक्रारींचा निपटारा झाल्याने सदर मेळाव्यांप्रती ग्राहकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर शहर विभागात १२ ठिकाणच्या मेळाव्यांमध्ये प्राप्त १३४ पैकी १२७ तक्रारी, कोल्हापूर ग्रामीण 1 विभागातील ८७ ठिकाणच्या मेळाव्यांमध्ये ३११ पैकी २९१ तक्रारी, कोल्हापूर ग्रामीण 2 विभागातील ३६ ठिकाणच्या मेळाव्यांमध्ये २६४ पैकी २०३ तक्रारी, गडहिंग्लज विभागातील २० ठिकाणच्या मेळाव्यांमध्ये २६४ पैकी २२२ तक्रारी, इचलकरंजी विभागातील ९ ठिकाणच्या मेळाव्यांमध्ये १६३ पैकी १५२ तक्रारी, जयसिंगपूर विभागातील २७ ठिकाणच्या मेळाव्यांमध्ये ३०४ पैकी २८२ तक्रारी जागेवर तात्काळ सोडवण्यात आल्या.
ग्राहकाने दाखल तक्रारींत प्रामुख्याने नवीन वीज जोडणी, वाढीव वीज बिले, सौर कृषी पंप, कृषिपंप ग्राहकांचा वीज भार कमी करणे, स्मार्ट टीओडी मीटरच्या तक्रारी व विविध शंका यांचा प्रामुख्याने समावेश होता. या मेळाव्यात स्मार्ट टीओडी मीटरच्या संबधीत सर्वच तक्रारींचे प्रात्यक्षिकांसह निरसण करण्यात आले. यावेळी ग्राहकांना पीएम सुर्यघर योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देणेकरीता कुसुम बी व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजनांची माहितीही देण्यात आली.

