शक्तिपीठ महामार्गामुळे शेती ,उद्योग , व्यवसायास धोका – स्वाभिमानाचे नेते राजू शेट्टी यांचा आरोप
माणगाव येथील बाधित शेतीची केली पाहणी
कोल्हापूर/ प्रतिनिधी
नागपूर -गोवा शक्तीपीठ महामार्गातील माणगांव ते पट्टणकोडोली या पंचगंगा नदीवरील भरावाने व पुलामुळे कोल्हापूर शहरासह पंचगंगा नदीच्या पश्चिमेकडील गावांना व शेतीला पुराचा धोका निर्माण होणार आहे. शेती , उद्योग , त्याबरोबरच साखर उद्योगावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याने शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातील खाईत लोटणार असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.
माणगांव ते पट्टणकोडोली ता. हातकंणगले येथून जात असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या माणगांव गावातील बाधित शेतक-यांच्या शेतामध्ये जाऊन राजू शेट्टी यांनी परिस्थितीची पाहणी केली. माणगांव ते पट्टणकोडोली या मार्गावरील पंचगंगा नदीवर दोन्ही बाजूला किमान चार ते पाच किलोमीटर भराव टाकावा लागणार आहे. या भरावामुळे पंचगंगा नदीच्या पश्चिमेकडील माणगांव , पट्टणकोडोली , रूकडी , हेरले , चोकाक , हालोंडी , शिरोली , कोल्हापूर शहर , गांधीनगर , वसगडे , चिंचवाड व वळीवडे या गावांना मोठा फटका बसणार आहे.
वरील सर्व गावातील प्रामुख्याने शेती संकटात येणार असून भरावामुळे पाणी निचरा होण्यास अडथळा निर्माण होवून दिड ते दोन महिने पिके पाण्यात राहणार आहेत. यामुळे परिसरातील जमीनींचे क्षारपड होण्याचे प्रमाणही वाढणार आहे. किंबहुना पुढील दहा वर्षात पश्चिमेकडील हजारो एकर जमीन क्षारपड झाल्याने साखर उद्योगावर मोठे संकट निर्माण होणार आहे. भरावामुळे पाणी पातळी वाढल्यास कोल्हापूर शहर, शिरोली व गांधीनगर येथील उद्योग व्यवसायाला मोठा फटका बसणार आहे.
मुळात डोंगरातून येणा-या पाण्याचा प्रवाह हा वेगात असतो यामुळे या पाण्यातून दगड व माती येण्याचे प्रमाण जास्त आहे. कोल्हापूर शहराच्या पुर्वेस नद्या संथ वाहतात यामुळे सर्व गाळ व मातीचा भराव नदीमध्ये मोठ्या प्रमाणात साचणार आहे. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार केल्यास शेतकरी , उद्योजक व व्यापारी तसेच शहरी नागरीकांना याचे दुरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत.